अहिल्यादेवी यांच्याकडून भारताच्या सांस्कृतिक परंपरेचे रक्षण : मोदी   

३०० व्या जयंतीनिमित्त अभिवादन

भोपाळ : लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांनी भारताच्या सांस्कृतिक परंपरेचे रक्षण केले, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहिल्यादेवी होळकर यांना शनिवारी अभिवादन केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्री शताब्दी जयंतीनिमित्त ‘लोकमाता देवी अहिल्यादेवी महिला सशक्तीकरण महासंमेलना’त मोदी बोलत होते. 
 
ते म्हणाले, अहिल्यादेवी यांचे नाव ऐकताच मनात श्रद्धा भाव निर्माण होतो. त्यांच्या महान कार्यासाठी शब्दही कमी पडतात. अहिल्यादेवी यांचे आयुष्य हे प्रेरणादायी आहे. इच्छाशक्ती आणि दृढ निश्चय असला की कितीही प्रतिकूल परिस्थिती असो, यश मिळवता येते, हे अहिल्यादेवी यांनी दाखवून दिले. देश पारतंत्र्यात असताना अहिल्यादेवींनी महान कार्य केले. ते पिढ्या न् पिढ्या कायम स्मरणात राहील. त्यांनी प्रभूसेवा आणि जनसेवा यामध्ये कधीही फरक केला नाही. त्यांनी कठीण काळातही राज्याचा कारभार समर्थपणे सांभाळला. त्यांनी गरीबांसाठी, वंचितांसाठी अपार कार्य केले. देशाच्या संस्कृतीवर, मंदिरावर आणि तीर्थक्षेत्रांवर हल्ले होत असताना त्यांनी काशी विश्वनाथसह अनेक मंदिरांचे जतन आणि पुनर्निर्माण केले. अहिल्यादेवींनी गरीब आणि वंचितांना नेहमीच प्राधान्य दिले. रोजगार निर्मितीसाठी त्यांनी अनेक योजना आणल्या. कृषी आणि हस्त उद्योगाला त्यांनी प्रोत्साहित केले. पाण्याचे महत्त्व त्यांनी तीन शतकांपूर्वीच जाणले होते. त्यांनी जलसंधारणासाठी अनेक तलाव बांधले. आदिवासी समाजासाठीही त्यांनी काम केले. माहेश्वरी साडीला नवी दिशा दिली. मुलींच्या लग्नाचे वय वाढविण्याचा विचार त्यांनी मांडला. महिलांना संपत्तीमध्ये अधिकार मिळाला पाहिजे, यासाठी कार्य केले. मालवा सैन्यात त्यांनी महिलांची खास तुकडी स्थापन केली होती. त्यांनी महिला सुरक्षेला प्राधान्य आणि बळ दिले. राष्ट्रनिर्माणमध्ये त्यांचे मोठे योगदान आहे, असेही त्यांनी सांगितले.
 
• पाकिस्तान आणि दहशतवाद्यांचे छुपे युद्ध खपवून घेतले जाणार नाही. गोळीला तोफगोळ्याने उत्तर दिले जाईल, असा इशारा मोदी यांनी यावेळी पाकिस्तानला दिला. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर राबविलेले ‘ऑपरेशन सिंदूर’ शौर्याचे प्रतीक आहे. दहशतवादांविरोधात राबविलेली पहिली मोठी कारवाई असल्याचेही त्यांनी सांगितले.
 
• सिंदूरला भारतीय संस्कृतीत मोठे स्थान असल्याचे सांगताना ते म्हणाले, सिंदूर महिला शक्तीचे प्रतीक आहे. रामभक्त हनुमानही सिंदूरमध्ये दिसतो. खेळातही सिंदूर आहे. शक्तीची पूजा करताना सिंदूर अर्पण केला जातो. त्यामुळे सिंदूर शौर्याचे प्रतीक आहे. 
 
• पाकिस्तानच्या छुप्या युद्धाला भारताने सडेतोड उत्तर देत भविष्यात भारतीय भूमीवर दहशतवाद कदापिही खपवून घेतले जाणार नाहीत, असेही ते म्हणाले. कारवाईमुळे महिलांचे सिंदूर आता शौर्याचे प्रतीक आणि दहशतवाद्यांचा काळ बनले आहे. तुम्ही गोळी झाडाला तर तोफगोळ्याने उत्तर दिले जाईल, असा इशाराही मोदी यांनी दहशतवाद्यांना दिला. 

Related Articles